हैदराबाद, 06 डिसेंबर : तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घ़डल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे
हैदराबादमधील महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 'आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे असं समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती जिवंत होती,' असं आरोपीनं म्हटलं होतं.सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिला पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी तिचे हातपाय बांधले. तसंच त्या महिलेला जबरदस्ती दारूही प्यायला लावली. त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडताच तिला पुलाखाली नेण्यात आलं आणि तिथं तिच्या अंगावर पेट्रोल टाकून त्या महिलेला जाळण्यात आलं,' असे खुलासे आरोपीने पोलीस कोठडीत केल्याचं हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं आहे.
चौकशीदरम्यान आरोपीनं सांगितलं होतं की, 'आम्हाला वाटलं बलात्कारानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही तिला जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा ती महिला जोरदार ओरडू लागली. त्यानंतर पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहचू नये म्हणून आम्ही तिला मारून टाकलं.'काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला. आरोपींना कडक शासन व्हावं यासाठी अनेक जण रस्त्यावर उतरले आहेत. आता या प्रकरणात त्या रात्री नेमकं काय घडलं हे हळूहळू समोर येत आहे.
27 नोव्हेंबर रोजी रात्री 4 नराधमांनी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर त्यांचा खून केला. यानंतर पीडित महिला डॉक्टरांचं मृत शरीरही जाळण्यात आलं. घटनेपूर्वी आरोपींनी काय कट रचला याबद्दल पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर महिला डॉक्टरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेच्या अगोदर महिला डॉक्टरने शेवटच्या क्षणी तिच्या धाकट्या बहिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. यात आता खळबळजनक माहिती समोर आली.
महिला डॉक्टरांच्या धाकट्या बहिणीने घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 'दीदीने रात्री 9.20 च्या सुमारास फोन केला होता आणि सांगितले होते की तिची गाडी पंचर झाली आहे. जे लोक तिची मदत करण्यासाठी पुढे आले होते, ते संशयास्पद वाटत आहेत. मी तिला फोन बंद करू नको आणि माझ्याशी बोलत रहा असं सांगितलं. पण, फोनची बॅटरी कमी असल्यामुळे आमचा संपर्क तुटला. त्यानंतर जे काही घडलं त्याने मी हादरले आहे. हे सगळं सांगताना बहिणीला रडू आवरलं नाही तर असा घाणरडं कृत्य कोणासोबतही होऊ नये असं तिनं म्हटलं आहे.







0 comments:
Post a Comment