प्रतिनिधी भोकर : अत्यंत पुर्वनियोजन करुन कट रचून संगनमताने किनवट येथील लढवय्ये सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार सुरेश मस्के यांचा दि.१४ ऑक्टोंबर रोजी रात्री निर्गुण खून करण्यात आला.सदरील घटनेस १० दिवस होऊन गेलीत व तपासात विलंब होत असल्याने आरोपी मोकाट राहण्याची शक्यता असून अद्यापही आरोपींना शोधण्यात किनवट पोलीसांना यश आले नाही.त्यामुळे सदरील गुन्ह्याच्या तपासणीक पोलीस अधिकाऱ्यांनी तपास गतिमान करुन मोकाट आरोपींना गजाआड करावे व मयत पत्रकार सुरेश मस्के यांना न्याय द्यावा,अशी मागणी कुटूंबीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाने दि.२३ ऑक्टोंबर रोजी कर्तव्यदक्ष भोकर अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तर मयत पत्रकार सुरेश मस्के यांना न्याय देण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करु,असे आश्वासन अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी सदरील शिष्टमंडळास दिले आहे.
किनवट येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार सुरेश दत्तात्रय मस्के यांचा दि.१४ ऑक्टोंबर २०२३ रोजी रात्री पुर्वनियोजन करुन कट रचून काही लोकांनी संगनमत करुन निर्गुण केला व तो अपघात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला.परंतू घटनास्थळीचे पुरावे व मयत सुरेश मस्के यांच्या शरीरावरील जखमांचे घाव पाहता तो अपघात नसून निर्गुण खून झाला असल्याचे निदर्शनास येत असल्याने कुटूंबियांच्या तक्रारीवरून किनवट पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील गुन्ह्याचा तपास किनवट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक बोरसे हे करत आहेत.परंतू सदरील तपास अतिशय संथगतीने सुरु आहे,असे कुटटूंबिय व सामाजिक कार्यकर्त्यांना वाटत असल्यामुळे मयत पत्रकार सुरेश मस्के यांचे बंधू रमेश मस्के, सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक श्याम कांबळे,राजेश कांबळे,अशोक निळकंठे, रावसाहेब वाघमारे यांसह आदींच्या एका शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षक कार्यालय भोकर येथे अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांची भेट घेतली व निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनातून त्यांनी म्हटले आहे की,सदरील गुन्ह्यातील गुन्हेगारांनी घटनेच्या काही दिवस आधीपासूनच याची पूर्व तयारी केली होती असे दिसून येते. त्याचे असे की,कार नादुरुस्त होण्यापासून ते प्रत्यक्ष खून होईपर्यंत या कालावधीत घडलेल्या घटनांचा घटनाक्रम पाहता यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा तपास करणे पोलीसांसाठी सहज शक्य आहे.परंतु हा गुन्हा दाखल होऊन १० दिवस झाले आहेत,तरी पण तपासाच्या बाबतीत पोलीसांनी फारशी प्रगती व तपास गतिमान केल्याचे दिसत नाही.पोलीस तपासाला जास्त विलंब झाल्यास गुन्हेगारांना त्याचा अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.कोणत्याही प्रकारचे वाद असले तरी खूनापर्यंत मजल जाणे हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अयोग्य आहे.फोरेन्सिक आणि सायबर सेल तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघ्या काही तासात गुन्हेगारांचा छडा लावणे शक्य असतांना तसे झाले नाही हे पोलीस तपासाचे अपयशच म्हणता येईल ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना सदरील निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की,तपासाची गुणवत्ता व तपासातील प्रगती यांचा आढावा घेवून आपण स्वतः त्याबाबतीत निर्णय घेऊन वरिष्ठ स्तरावर तपास सोपवावा. कारण सद्या ज्या स्तरावर पोलीस तपास आहे त्याची गती व पध्दत पाहता कुठे तरी तपासाची दिशा योग्य नसल्याचे दिसत असून गुन्हेगार हे अद्याप ही हाती लागत नसल्याचे सिध्द होत आहे.गुन्हेगारांचे पकडले जाणे व दोष सिध्दीसाठी योग्य तथा सक्षम पणे तपासाला गती देणे गरजेचे आहे.त्यामुळे तपास गतिमान करावा व आरोपींना अटक करण्यात यावी आणि कठोरात कठोर शिक्षा व्हावी.तरच मयत सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार सुरेश मस्के यांना न्याय मिळेल,असे नमुद करण्यात आले आहे.
सदरील निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे गृहमंत्री,नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री,राज्याचे पोलीस महासंचालक,नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक,नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व भोकरचे अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.निवेदन देण्यास आलेल्या शिष्टमंडळा सोबत अपर पोलीस अधीक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी सविस्तर चर्चा केली व सदरील गुन्ह्याचा तपास योग्यरित्या केल्या जाईल आणि त्यातून मयत पत्रकार सुरेश मस्के यांना नक्कीच न्याय मिळवून देण्याचा आम्ही यशस्वी प्रयत्न करु,असे आश्वासित केले आहे.







0 comments:
Post a Comment