नांदेड | गोदावरी नदीतून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसील कार्यालयाच्या पथकाने कौठा परिसरातील स्मशानाजवळच्या नदीकाठावरील 50 तराफे जाळल्यानंतर परत येतांना जवळपास 200 लोकांच्या जमावाने त्या वाहनावर चारही बाजूनी तुफान दगडफेक केली आहे . या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .
नांदेडचे तहसीलदार अरुण जराड यांचे सरकारी वाहन क्रमांक एम . एच . 26 आर . 2611 घेवून मंडळ अधिकारी के . एम . नागरवाड , अनिल धुळगंडे , तलाठी मनोज देवणे , प्रदिप पाटील , सचिन नरवाडे , श्वेता लाठी , कोतवाल बालाजी सोनटक्के आणि वाहन चालक शेख जहिरोद्दीन हे कौठा परिसरातील नदी घाटावर गेले त्या ठिकाणी उपलब्ध असलेले नदीतून वाळू काढण्यासाठीचे 50 तराफे या पथकाने जाळून टाकले . ते पथक परत येत असतांना अंधार झाला होता . या अंधाराचा फायदा घेत अवैध रेती उपसा करणाऱ्या कामामध्ये नेहमी लिप्त असलेल्याजवळपास 100 ते 200 जणांच्या जमावाने ज्यात बहतांश महिला होत्या . त्यांनी हल्ला केला . चौहूबाजून जोरदार दगडफेक झाली . या दगडफेकीत कोणालाही मार लागला | की , नाही याची माहिती प्राप्त झाली नाही . जमावाने सरकारी लोकांना आर्वाच्च शिवीगाळ केली आणि धक्काबुक्कीही केली . घटनेची माहिती अरुण जराड यांना कळाली तेंव्हा त्यांनी नायब तहसीलदार मुंजाजी काकडे यांना सोबत घेवून घटनास्थळ गाठले . त्वरीत पोलीसांना सुध्दा बोलावण्यात आले .
इतवाराचे पोलीस उपअधिक्षक धनंजय पाटील , इतवाराचे पोलीस निरिक्षक प्रदीप काकडे , नांदेड ग्रामीणचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तेथे धावले . पोलीस येईपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते . या संदर्भाने तहसीलदार अरुण जराड यांच्याशी संपर्क साधला तेंव्हा त्यांनी कितीही मोठी दहशत आमच्याविरुध्द पसरवली तरी सुध्दा अवैध रेती उपसा है थांबवण्याची कार्यवाही आम्ही करत राहणार असे सांगितले . वृत्त लिहिपर्यंत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या संदर्भाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती .







0 comments:
Post a Comment